जालना : जालना पोलिसांनी नुकतेच पैसे घेऊन लग्न लावणाऱ्या आणि लग्न झाले की नवरी फरार होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यावरून पोलिसांचे कौतूक सुरू असतानाच आणखीन एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एका गावातील मुलीच्या नातेवाईकांनी मुलाकडून १ लाख रुपये देऊन तिचे लग्न केले. परंतु, लग्नानंतर आठ दिवसातच राहिल्यानंतर नवरी बेपत्ता झाल्याचा प्रकार घडलाय. ही घटना जाफराबाद तालुक्यातील भारजमधील आहे. या प्रकरणी दिनेश बोडके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीत म्हटले की, लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना वरूड बु. येथील रामराव घायवट यांनी एक स्थळ आणले. मुलगा आणि त्याचे नातेवाईक बुलडाणा येथे मुलीला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी घायवट यांनी बसस्थानकात भेट घेतली. यानंतर ते सर्व एका हॉटेलमध्ये गेले. तिथे मुलगी आणि तिच्या आईशी ओळख करून दिली. दरम्यान, मुलीकडची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे रामराव घायवट यांनी मध्यस्थी म्हणून १ लाख ११ हजार रुपये मुलीच्या आईला देण्याचे ठरवले. यानंतर ही रक्कम देण्यात आली. त्यानंतर लग्न समारंभ पार पडला. दि. १० ते १८ जानेवारी या कालावधीत ती मुलगी व्यवस्थित राहिली. मात्र, १८ जानेवारी रोजी ती मुलगी कुणालाही न सांगता अचानक गायब झाली. यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात अगोदरच बनावट लग्न करून अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर वधुंच्या शोधात असलेल्या वर पालकांची धाकधूक वाढली आहे.